आष्टी दि.११ (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरापूर येथे सोमवारी (दि.११) पहाटेच्या सुमारास व रविवारी रात्री केरूळ येथे लागलेल्या भीषण आगीत दोन किराणा दुकानाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे दिसले.
ऋषिकेश हरिश्चंद्र जगताप यांचे गावातील मुख्य चौकात 'स्वामी समर्थ किराणा आणि जनरल स्टोअर्स' नावाचे दुकान आहे. सोमवारी पहाटे ४ च्या सुमारास दुकानातून मोठा आवाज आल्याने ऋषिकेश बाहेर आले असता, त्यांना दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे दिसले.आग लागल्याचे समजताच ऋषिकेश यांनी तातडीने ग्रामस्थांना पाचारण केले. तरुणांनी विद्युत मोटारी सुरू करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केल्याने दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले. सुमारे दोन तास मदतकार्य सुरू होते, पण दुर्दैवाने काहीच वाचवता आले नाही.दुसरी घटना रविवारी रात्री केरूळ (ता. आष्टी) येथे घडली. दिलीप भंडारी यांच्या किराणा दुकानाला अचानक लागलेल्या आगीत दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. येथेही ग्रामस्थांनी आणि अग्निशमन बंबाने आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत दुकानातील आर्थिक हानी झाली होती. या दोन्ही घटनांमुळे आष्टी तालुक्यातील व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.

