दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्रीनितीश कुमार यांनी आज अखेर विधान परिषद सदस्य (एमएलसी) पदाचा राजीनामा दिला आहे. नुकतेच ते राज्यसभेवर निवडून गेले,ज्यामुळे नियमानुसार त्यांना आमदारकी सोडणे आवश्यक होते. विशेष म्हणजे, राजीनामा देऊनही ते पुढील काही दिवस मुख्यमंत्री पदावर कायम राहणार आहेत. अशा परिस्थितीत, बिहारचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नितीश कुमार पुढील काही दिवसांत मुख्यमंत्री पदाचाही राजीनामा देऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र नियमांनुसार ते अजून सहा महिने मुख्यमंत्री पदावर राहू शकतात. राज्यसभेवर निवडून आल्यानंतर त्यांना विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देणे बंधनकारक होते. त्यामुळे त्यांनी आमदारकी सोडली असले तरी मुख्यमंत्रिपद कधी सोडणार याबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे.
रविवार संध्याकाळपासूनच नितीश कुमार राजीनामा देणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली होती. त्यानंतर जेडीयूचे अनेक वरिष्ठ नेते मुख्यमंत्री निवासस्थानी भेटीसाठी पोहोचले. त्यामध्ये जेडीयूचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष संजय कुमार झा, मंत्री विजय कुमार चौधरी, विजेंद्र यादव आणि अशोक चौधरी यांचा समावेश होता. नितीश कुमारांनी एमएलसी पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता बिहारच्या राजकारणात मुख्यमंत्री पदाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. ते मुख्यमंत्री पद कधी सोडणार किंवा पुढील राजकीय निर्णय काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

