केज दि.२६(प्रतिनिधी: तालुक्यातील(Kaij) चिंचोलीमाळी येथील ३० वर्षीय युवकाचा दुचाकी अपघातात मृत्यु झाल्याची घटना बुधवार (दि. २५) सायंकाळी घडली. संपत शिवाजी राऊत असे मृत युवकाचे नाव आहे. मात्र, या अपघाताला केवळ चुकून घडलेली दुर्घटना मानावे की पूर्वनियोजित घातपात, याबाबत मृताच्या कुटुंबियांनी गंभीर शंका उपस्थित केली आहे.
मृत युवकाचे नाव संपत शिवाजी राऊत (३०, रा. चिंचोलीमाळी) (Kaij)असे आहे. बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास तो आपल्या दुचाकीवरून केजकडे जात असताना टाकळी शिवारातील एका वळणावर त्याची दुचाकी रस्त्यालगत असलेल्या झाडाला धडकली. या अपघातात त्याचा जागीच मृत्यु झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह केज उपजिल्हा रुग्णालयात हलवला.
परंतु या मृत्यूमागील पार्श्वभूमी लक्षात घेतली असता, ही केवळ अपघाताची घटना नसून घातपात असावा, असा संशय मृताच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. संपत राऊत याने दोन वर्षांपूर्वी गावातीलच दुसऱ्या समाजातील मुलीसोबत आंतरजातीय विवाह केला होता. या विवाहामुळे त्याचे सासरच्यांशी संबंध तणावपूर्ण होते. बुधवारी दुपारी सासरच्या मंडळींशी त्याचे भांडण झाले होते. त्यानंतर ते केज पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात तक्रार देण्यासाठी निघाले, ही माहिती मिळताच संपत दुचाकीवरून केजकडे निघाला होता. परंतु वाटेतच त्याचा मृत्यु झाला.