मुंबई : राज्यातील लाखो शिधापत्रिकाधारकांना यापुढे स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळणार की नाही, याची चिंता होती. परंतु, नाशिकसह राज्यातील एकही पात्र शिधापत्रिकाधारक स्वस्त धान्य दुकानातून मिळणाऱ्या अन्नधान्यापासून वंचित राहू नये, यासाठी शिधापत्रिकाधारकांच्या हिताचा विचार करुन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्राकडे सासत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले. केंद्र शासनाने घेतलेल्या एका निर्णयामुळे आता महाराष्ट्रातील शिधापत्रिकाधारकांना दिलासा मिळाला आहे.
स्वस्त धान्य दुकांनांमधून मिळणाऱ्या अन्नधान्यावर अनेक शिधापत्रिकाधारक आपले महिन्याचे आर्थिक गणित जुळवत असतात. शिधापत्रिकेवर मिळणारे अन्नधान्य अशा कुटुंबांसाठी मोठा आधार ठरत असते. त्यामुळे शिधापत्रिकेवर नवीन कोणत्या वस्तू मिळतील, याकडेही शिधापत्रिकाधारकांचे लक्ष लागून असते. परंतु, काही वेळा शासकीय निर्णयांमुळे शिधापत्रिकाधारकांची धडधड वाढते. आपणास महिन्याचे अन्नधान्य मिळेल की नाही, याची चिंता त्यांना सातवत असते. अशाच एका निर्णयामुळे शिधापत्रिकारधारक धास्तावले होते. राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य वितरणाची मुदत यापूर्वी १५ जूनपर्यंत निश्चित करण्यात आली होती. परंतु, या मुदतीत पात्र सर्व लाभार्थ्यांना धान्य वितरण करणे अशक्य असल्याने स्वस्त धान्य दुकानदारांमपुढेही समस्या उभी राहिली होती. निर्धारित १५ जून या मुदतीपर्यंत राज्यातील सुमारे ७५ टक्के लाभार्थ्यांनाच धान्याचे वितरण पूर्ण झाले होते. सुमारे २५ टक्के लाभार्थी वेगवेगळ्या कारणांमुळे शिधापत्रिकेवर मिळणाऱ्या धान्यापासून वंचित राहिले होते. त्यामुळे कोणताही पात्र लाभार्थी धान्यापासून वंचित राहू नये, यासाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारकडे मुदतवाढ देण्याची मागणी केली होती.
केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे पाठपुरावा करुन मंत्री छगन भुजबळ यांनी धान्य वितरणाची मुदत १५ जून करण्यात आल्याने महाराष्ट्रात निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती दिली. या मुदतीत ज्यांना स्वस्त धान्य दुकानातून मिळणाऱ्या धान्याचा लाभ झाला नाही, अशा उर्वरित लाभार्थ्यांना धान्याचा लाभ मिळावा, यासाठी वितरणाची मुदत वाढविण्याची विनंती केली. मंत्री भुजबळ यांच्या या मागणीची दखल घेत केंद्र शासनाने महाराष्ट्रासाठी धान्य वितरणाची मुदत ३० जूनपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे नाशिकसह राज्यातील लाखो शिधापत्रिकाधारक कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. उर्वरित सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत या निर्णयामुळे धान्य पोहोचविता येणार आहे. मुदतवाढीच्या निर्णयानंतर राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य वितरणाची प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे. पात्र लाभार्थ्यांनी आपल्या जवळच्या स्वस्त धान्य दुकानात जाऊन नियमानुसार धान्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे. एकही पात्र लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित राहू नये, यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून यापुढेही लाभार्थ्यांच्या हितासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येतील, असे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

