मुंबई :लाडकी बहीण योजनेसाठीची ईकेवायसीतील दुरुस्ती करण्याची मुदत ३१ मार्च रोजी संपत आहे. या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली असून ईकेवायसीनंतर ही संख्या १ कोटी ७६ लाखांवर आली आहे. योजनेच्या सुरुवातील २ कोटी ४७ लाख लाभार्थ्यांची असलेली ही संख्येत घट होऊन जवळपास ७१ लाख महिला या योजनेतून बाद होणार आहेत. आज मंगळवारी या ईकेवायसीच्या दुरुस्तीचा अखेरचा दिवस आहे.
विधानसभा निवडणुकीआधी सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून गरजू महिलांच्या बँक खात्यावर दरमहिना १५०० रुपये निधी जमा करण्यात आला. प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या या याजनेचा फायदा महायुती सरकारला झाल्याने राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता आली. मात्र या योजनेत मोठ्या प्रमाणावर बोगस लाभार्थी घुसल्याचे सरकारच्या निदर्शनास आणले. केवळ अडीच लाखांचे उत्पन्न असणाऱ्यांसाठी असलेल्या या याजनेत सधन महिला तसेच सरकारी कर्मचारी महिलांनीही लाभ घेतल्याचे स्पष्ट झाले. सुरुवातीला लाभ घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना अंकुश लावल्यानंतर ईकेवायसीच्या माध्यमातून अन्य बोगस लाभार्थ्यांना या योजनेतून बाद करण्याची योजना आखण्यात आली.
त्यानुसार ईकेवायसीसाठी ३१ डिसेंबरची अंतिम मुदत देण्यात आली. २ कोटी ४७ लाख महिलांतून ई केवायसीमध्ये १ कोटी ७० लाखांच्या आसपास महिलांना ईकेवायसी करण्यात यश आले. मात्र यादरम्यान अनेक महिलांनी कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरीत आहे किंवा नाही यासाठी देण्यात आलेल्या पर्यायांतून चुकीचा पर्याय निवडल्याने त्यांचा १५०० रुपयांचा हप्ता बंद झाला. अशा महिलांच्या तक्रारीनंतर दुरुस्तीकरण्यासाठी पुन्हा एकदा ३१ मार्चची मुदत देण्यात आली. ही मुदत मंगळवारी संपत आहे. ही शेवटची संधी असल्याने त्यानंतर कोणतीही नवीन मुदत देण्यात येणार नाही.
दरम्यान महिला व बालविकास विभागाकडे असलेल्या नोंदीनुसार सध्या १ कोटी ७६ लाख ५८७६ महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहे. जानेवारी महिन्यात ही संख्या १ कोटी ६९ लाख इतकी होती. त्यामुळे लाडकी बहीण लाभार्थ्यांची संख्या २ कोटी ४७ लाखांवरून सध्या सुमारे ७१ लाखांपर्यंत कमी झाली आहे. सरकारला लाडकी बहीण योजनेसाठी द्यावा लागणाऱ्या निधीतही बचत होणार आहे.

