Advertisement

अंकुशनगर हत्याप्रकरणाचे खरे कारण आले समोर

प्रजापत्र | Tuesday, 13/01/2026
बातमी शेअर करा

बीड-शहरातील अंकुशनगर भागातील नगरपालिकेतील कंत्राटी कर्मचारी असलेल्या हर्षद शिंदेची (वय-३८) मंगळवार (दि.६) रोजी विशाल सूर्यवंशी या तरुणाने निर्घृण पद्धतीने हत्या केली होती.भरदुपारी घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाल्यानंतर आरोपीला शिवाजीनगर व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून रविवारी (दि.११) ताब्यात घेतले.सोमवारी आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.अखेर पोलीस तपासातून हत्यचे खरे कारण समोर आले आहे.लहानपणीच्या भांडणांचा राग मनात साठल्यामुळे आपण हे कृत्य केल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांनी दिली. 
       शहरातील अंकुश नगर भागात पाईपलाईनचे काम करत असलेल्या हर्षद शिंदे (वय-३८) या तरुणावर भरदुपारी गोळ्या झाडण्यात आल्या.मात्र त्या गोळ्या हर्षदला न लागल्यामुळे त्याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला.यावेळी त्याचा पाठलाग करून धारदार शस्त्राने वार करत त्याची हत्या करण्यात आली.भरदुपारी घडलेल्या या रक्तरंजित राड्यामुळे खळबळ उडाली होती.घटनेनंतर विशाल उर्फ बप्या सूर्यवंशीने पळ काढल्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे दोन तर शिवाजीनगर पोलिसांचे एक पथक त्याच्या मागावर होते.चार दिवसांच्या मोहिमेनंतर रविवारी (दि.११) त्याला केजकडे येत असताना दुचाकीसह ताब्यात घेण्यात आले.दरम्यान सोमवारी (दि.१२) आरोपीला न्यायालयापुढे हजर केल्यानंतर चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.पोलीस तपासातून आता विशाल सूर्यवंशीने हर्षदला जीवे मारण्यामागे लहानपणीचे भांडणे कारणीभूत असल्याचे सांगितले आहे.त्यामुळे आता पोलिसांनी देखील डोक्यावर हात मारून घेतले.लहानपणीच्या भांडणाचा राग मनात ठेवून तब्बल १५ ते २० वर्षानंतर त्याचा बदला घेण्यासाठी आरोपीने एवढे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येते.दरम्यान पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर हे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. 

 

आरोपी होता दारूच्या नशेत 
पोलीस निरीक्षक प्रविणकुमार बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विशाल उर्फ बप्या सूर्यवंशी घटनेदिवशी दारूच्या नशेत होता.हर्षदला घरासमोर काम करताना पाहिल्यानंतर त्याला बालपणीच्या भांडणाची आठवण झाली आणि जुन्या आठवणी नशेत ताज्या झाल्यानंतर त्याने पिस्टल सोबत घेत हर्षदवर आधी गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला.मात्र त्यात यश न आल्यामुळे त्याचा पाठलाग करून खून केला.कधी काळी झालेले भांडणे जीवावर उठल्यामुळे पोलिसांना देखील याचे आश्चर्य वाटत आहे.  

 

Advertisement

Advertisement