गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील खेडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे चार विद्यार्थी गावाशेजारील सती नदीत बुडाले. यावेळी तिघांचा करुण अंत झाला तर एकाला वाचविण्यात यश आले.१ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजता ही हृदयद्रावक घटना घडली. लक्ष्मण सुन्हेर दुधकवर (वय ६ ), कुणाल नरेश दुधकवर (वय ५ ) व कोहित युवराज सराटे (वय ११ ) अशी मृत मुलांची नावे आहेत. सुदैवाने आविश विनोद आमले (वय १३) हा विद्यार्थी बचावला.
खेडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेची सकाळची शाळा सुटल्यानंतर सदर चार विद्यार्थी गावाजवळील सती नदीच्या घाटावर पोहण्यासाठी गेले होते. नदीत पाण्याचा अंदाज न आल्याने हे चौघेही पाण्यात बुडू लागले.दुसरीकडे, याच सती नदी घाटावर कन्हारटोला येथील काही मच्छीमार बांधव मासेमारीचे काम करत होते. त्यांना चार मुले पाण्यात वाहून जाताना दिसली, त्यांनी पाण्यात उड्या घेतल्या, पण तिघांचे मृतदेहच हाती आले. शाळा सुटल्यानंतर आनंदाने घराकडे निघालेली मुले सती नदीकडे गेली आणि दुर्दैवाने तिघांचा मृत्यू झाला. या घटनेने खेडेगावसह संपूर्ण कूरखेडा तालुक्यात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

