मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज अकरावा दिवस आहे. काल मध्यरात्री प्रसाद लाड, उदय सामंत आणि इतर मंत्र्यांनी मनोज जरांगे यांच्याशी फोनद्वारे संवाद साधला होता.त्यानंतर मनोज जरांगे यांनी बंद केलेले वैद्यकीय उपचार पुन्हा सुरू केले आहेत.आज पुन्हा एकदा सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली होती.मात्र, आता हे शिष्टमंडळ जरांगे यांच्या भेटीसाठी जाणार नसल्याची माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. तसेच, जरांगे अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम असतील, तर तो त्यांचा निर्णय असल्याचे विखे पाटील यांनी म्हटले आहे. तसेच सरकारकडून प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, "जरांगे अजून ठाम असतील तर तो त्यांचा निर्णय आहे. शासनाकडून जे जे निर्णय करणे आवश्यक होते ते आपण केलेले आहेत. त्यात त्यांचे समाधान होत नाही. आपण प्रयत्न करत आहोत पण त्याच्या पलीकडे जाऊन त्यांच्या मनात काही अजूनही प्रश्न असतील तर ते आपण सोडवतच आहोत. शेवटी मराठा समाजाच्या व्यापक हिताकरता आपण निर्णय करत आहोत. त्या निर्णयाची अंमलबजावणी सुद्धा सुरू आहे. त्यात मनोज जरांगे समाधानी नाहीत. त्याच्यामुळे असा काही पर्याय नाही,ज्यामुळे मी त्यांचे समाधान करू शकेल," असे त्यांनी म्हटले.

