Advertisement

भर पावसात , अगदी चिखलात बसून लाखो महिलांनी ऐकली शिवकथा 'वशिल्या'वाले खुशाल, सामान्य भक्तांचे हाल

प्रजापत्र | Thursday, 12/06/2025
बातमी शेअर करा

बीड दि. ११ (प्रतिनिधी ): प्रदिप मिश्रांची शिवकथा म्हणजे लाखोंची गर्दी यात आता काही आश्चर्य राहिलेले नाही. प्रदिप मिश्रांच्या शिवकथेचे सामान्यांवर , त्यातही महिलांवर असलेले गारुड सध्या चाकरवाडीमध्ये पाहायला मिळत असून रोज गर्दीचे नवे नवे उच्चांक स्थापित केले जात आहेत. बुधवारी तर चाकरवाडीत मंडपांमध्ये बसायला तर सोडा, मंडपाच्या बाहेर उभे राहायला देखील जागा नसल्याचे चित्र होते, जागा मिळेल तिथे बसून, उभे राहून भक्त, विशेषतः महिला शिवकथा ऐकत होत्या, त्यातच पाऊस आला, मात्र पडत्या पावसात चिंब भिजत, अगदी चिखलात बसून लाखोंनी आपल्या शिवभक्तीची परीक्षा दिली. मात्र आयोजकांच्या नियोजनाचे पितळ देखील यावेळी उघडे पडले.
चाकरवाडी येथे मागच्या चार दिवसांपासून ज्ञानेश्वर  माउली यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त पंडित प्रदिप मिश्रा यांची शिवपुराणकथा सुरु आहे. पंडित प्रदिप मिश्रा यांची कथा म्हणजे शिवभक्तांसाठी दुर्मिळ पर्वणी असते, जेथे कोठे या कथा होतात, तेथे लाखोंच्या संख्येत भक्त येत असतात. त्यामुळे चाकरवाडीममध्ये देखील राज गर्दीचे नवेनवे उच्चांक स्थापित केले जात आहेत. बुधवारी शिवभक्तांनी खऱ्याअर्थाने आपल्या भक्तीची परीक्षा दिल्याचे चित्र पाहायला मिळाले. बुधवारी कथेदरम्यान जोरदार पाऊस झाला, यावेळी अक्षरशः पावसात भिजत 'शंभो ' च्या जयघोषात लाखो भक्तांनी, त्यातही मोठ्याप्रमाणावर महिला भक्तांनी शिवकथेचे श्रवण केले. भक्तीपुढे कोणतेच आव्हान  किंवा अडचण मोठी नसते हेच चाकरवाडीच्या भूमीत 'खऱ्या भक्तांनी' दाखवून दिले.

वशिल्यावाले खुशाल
पंडित प्रदीप मिश्रांची कथा म्हणजे शिवभक्तांसाठी मोठी पर्वणी , मात्र येथेही मोठे भक्त आणि सामान्य भक्त असे द्र सहन घडतेच आहे. ज्यांनी मोठमोठ्या देणग्या दिल्या, किंवा ज्यांचे वशिले आहेत, त्यांच्यासाठी वेगळ्या पासची सोय करण्यात आली.त्यांना पास  दाखवून  वॉटरप्रूफ मंडपात  पुढच्या बाजूला जागा आरक्षित आहेत. त्यांच्यासाठी कोठे सोफे,कोठेगाद्या , कोठे चटया असे ज्याच्या त्याच्या 'योग्यते 'प्रमाणे अंथरण्यात आलेले आहे.(दोन दिवसांपूर्वी 'स्थानिक ' कारणाने सोफे काढण्यात आले असे सांगितले जाते  ) इतकेच नाही, इतरांना म्हणजे सामान्यांना साधी बसण्याण्यासाठी जागा पुरत नसली तरी या 'खास 'लोकांची व्यवस्था मात्र वेगळीच आहे. सामान्यांना म्हणजे जे रिक्षाने, बसने कथा ऐकायची म्हणून येतात, त्यांना भलेही पाच किलोमीटर चालत यावे लागत असेल, वशिलेवाल्यांच्या गाड्या थेट मंडपापर्यंत येतील अशी व्यवस्था आहे. त्यामुळे या खास लोकांना पावसाचा देखील काही त्रास झाला नाही, ते खुशाल राहिले, इतरांचे मात्र हाल झाले, मात्र त्यांचा विचार करायचा कोणी ? आणि त्यांच्यासाठी बोलायचे कोणी ?

'शेठ ' ची ओळख महत्वाची
शिवपुराण कथेच्या दुसऱ्या दिवशी पंडित प्रदीप मिश्रांनी एक कथा सांगितली होती. त्यात 'दोन लोकांना पोलीस घेऊन जातात, त्यातला एक व्यक्ती, ज्याची कोणाशी ओळख नसते तो गुपचूप जेलमध्ये जातो, दुसरा व्यक्ती मात्र पोलिसांनाच तुम्ही मला हात लावू शकत नाही, माझी 'शेठ 'सोबत ओळख आहे असे सांगते, पोलीस त्याला शेठ चे नाव विचारतात आणि नाव ऐकल्यावर सोडून देतात ' असे सांगितले होते. हे सांगण्यामागचा त्यांचा हेतू भगवान शिवशंकराची ओळख सांगा हा होता, इथे मात्र प्रत्येकालाच इतकी मोठी भक्ती शक्य नाही. ज्यांची 'शेठ ' सोबत ओळख होती, त्यांना पास मिळाले, त्यांची सोय झाली, जे 'शेठ'ला ओळखत नाहीत, त्यांना मात्र भक्तीसाठी पावसात भिजावे लागत असेल आणि चिखल तुडवावा लागत असेल तर त्याला आयोजक तरी काय करणार ? शेवटी 'शेठ ' सोबत ओळख महत्वाची .

 

उपेक्षितांसाठी होती माऊलींची सावली  
चाकरवाडी येथे ज्या ज्ञानेश्वर  माउली यांच्या पुण्यस्मरणानिमित्त  आयोजित सप्ताहात ही शिवकथा होत आहे, ते ज्ञानेश्वर माउली म्हणजे २१ व्या शतकातील थोर विभूती होते. खऱ्याअर्थाने समाजातील उपेक्षित, गरीब, ज्यांच्याकडे काही नाही अशा वर्गाला भक्ती शिकविण्याचे आणि अध्यात्माचे ज्ञान देण्याचे काम माउलींनी केले. माउली म्हणजे खऱ्याअर्थाने गोरगरिबांची सावली  होते . त्यांच्या साऱ्या सिद्धी त्यांनी गरीब, उपेक्षितांसाठी वापरल्या, मात्र त्याच माउलींच्या भूमीत आज सामान्यांना आपल्या भक्तीची कसोटी चिखलात बसून, पावसात उभे राहून द्यावी लागली आणि वशिल्यावाले , पासवाले मात्र सुखात होते.

 

Advertisement

Advertisement