बीड दि. ४ (प्रतिनिधी): जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची संकल्पना आणि त्याला आ. संदीप क्षीरसागर यांनी उभे करून दिलेले निधीचे पाठबळ यामुळे बीड शहरातून जाणाऱ्या बिंदुसरा नदीच्या स्वच्छतेचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. प्रशासनाचे लक्ष असल्याने या स्वच्छता मोहिमेचा सध्या जोर आहे, मंत्र एकीकडे हा स्वच्छतेचा जोर असतानाच दुसऱ्या बाजूला अजूनही रोज कचऱ्याचे ढीगच्या ढीग टाकले जातच आहेत. शहरातील कचरा टाकण्यासाठी अनेकांना बिंदुसरा नदी पात्र हक्काची जागा वाटते, त्यामुळे नदीपात्राच्या बाजूला कचऱ्याचे थर साचत आहेत . हे कचऱ्याचे थर आणि नदी पात्रातील किंवा पूररेषेतील बांधकामे यामुळे शहरवासीयांना मात्र पुराच्या धोक्याचा घोर लागून राहिलेला आहे. बिंदुसरा नदीच्या पर्यावरणाचे वाटोळे करण्याच्या या प्रकाराबाबत आता पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन खरोखर कठोर भूमिका घेणार का हा प्रश्न आहे.
बीड शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नाडीची अवस्था बकाल झालेली आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर झाडे उगवली होती, त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाला देखील अडथळा निर्माण होत होता. हे लक्षात घेऊन बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी नदी स्वच्छतेची मोहीम हाती घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला म्हणल्यावर बीडचे आ. संदीप क्षीरसागर यांनी देखील या कामाला निधीचे पाठबळ उभे करून दिले. आता बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके दर एक दोन दिवसांनी नदी स्वच्छतेचे काम जोरात सुरु असल्याचे फोटो समाजमाध्यमांमध्ये टाकत असतात. एकूण काय तर बिंदुसरा नदी स्वच्छ करण्याचे काम प्रशासनाच्या दृष्टीकोनातून जोरात सुरु आहे.
मात्र या साऱ्या प्रकारची दुसरी बाजू तितकीच काळीकुट्ट आहे. आजही शहरातील कचरा मोठ्याप्रमाणावर बिंदुसरा पात्रात किंवा पात्राच्या काठावर आणून टाकला जात आहे. खाजगी लोक तर हा कचरा टाकतातच, मात्र नगरपालिकेचे स्वच्छता विभागाचे लोक देखील दूर जायला नको म्हणून नदी पात्र म्हणजे कचऱ्यासाठीची हक्काची जागा असल्यासारखे काठावर आणून कचरा टाकत आहेत. त्यामुळे एकीकडून कितीही स्वच्छता मोहीम हाती घेतली तरी कचऱ्याचे थर काही कमी व्हायला तयार नाहीत. मग बिंदुसरा नदीचे 'पर्यावरण' चांगले राहणार कसे?
बिंदुसरा नदीच्या पात्रात अनेक कृत्रिम अडथळे निर्माण केलेले आहेत. अनेक ठिकाणी मनमानीपणे प्रवाह वळविण्यात आलेला आहे. नदी पात्रात भराव टाकून रस्ते, मैदान करण्याचा प्रयत्न झालेला आहे. तर पूररेषेत नगरपालिकेच्या आशीर्वादाने मोठमोठ्या बिल्डरांनी पक्के बांधकाम केले आहे. हे सारे अडथळे भविष्यात महापुराच्या निमंत्रण देणारे आहेत. मॉन्सून पूर्वतयारी बैठकीतच स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी बिंदुसरा नदीच्या पूररेषेतील आणि नदी पात्रातील अतिक्रमणे, पक्की बांधकामे काढण्याचे आदेश दिले होते. मात्र कागदी घोडे नाचविण्यापलीकडे नगरपालिकेने काहीच केले नाही. पक्क्या बांधकामांना हात लावायचा म्हणले की नगरपालिका भूमिअभिलेख विभागाकडे किंवा पाटबंधारे विभागाकडे बोट दाखवून मोकळी होते, मात्र यातून सारेच प्रशासन सामान्यांच्या जीविताशी खेळत आहे. पूररेषेतील बड्या भूमाफियांच्या बांधकामांना धक्का लावायचा नको म्हणून कधी नोटीस दिल्याचे तर कधी मोजणी नसल्याचे सांगत वेळकाढूपणा केला जातो, आता पालकमंत्री असलेले अजित पवार, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे आणि कर्तव्यदक्ष अशी प्रतिमा असलेले जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन या वेळकाढूपणाला चाप लावून बिंदुसरा नदी अतिरकरमनमुक्त करून घेणार का याकडे बीडकरांचे लक्ष आहे.
प्रशासनाला नाही गांभीर्य
बीड शहरातील बिंदुसरा नदीच नव्हे तर शहरातील कर्परा नदी आणि इतर ओढ्यांवर देखील मोठ्याप्रमाणावर अतिक्रमणे आहेत. नदीच्या पूररेषेत, ओढ्यावर बेकायदा बांधकामे झाली आहेत. अनेकदा मोजणी झाली पण कारवाई होत नाही. खरेतर नदी, ओढे अतिक्रमणमुक्त करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यायला हवा, मात्र सामाजिक कार्यकर्त्यांनी यासाठी पुढे आल्यानंतरही प्रशासन हलत नाही. नगरपालिका तर पूररेषेत देखील पीटीआर , नाहरकत द्यायला बसली आहे. प्रशासनाला या प्रश्नाचे कसलेच गांभीर्य नाही .
रामनाथ खोड (सामाजिक कार्यकर्ता)