Advertisement

संपादकीय अग्रलेख- बोगस जाहिरातबाजीबद्दल केंद्राचे नियम ,पण राज्यात लेकरू लोकांचं अन नाचतंय .....

प्रजापत्र | Sunday, 29/06/2025
बातमी शेअर करा

परीक्षांचे निकाल लागले की कोणत्याही शहरातील भिंती , रस्ते आणि चौक विद्रुप होतात हे खाजगी कोचिंग क्लासेसच्या  (Coaching classes) जाहिरातींनी. वर्षभर किंवा दोन वर्ष अभ्यास करायचा विद्यार्थ्यांनी , त्यांच्यासाठी रात्री जागवायच्या त्यांच्या पालकांनी , खाजगी कोचिंग क्लासेसची लाखोंची फी (Tution fees? भरायची पालकांनी आणि त्या विद्यार्थ्याने मिळविलेल्या 'सक्सेस' ( Success) वर दावा करायचा तो मात्र खाजगी क्लासेसनी. खरेतर खाजगी कोचिंग क्लासेसला असली काही फसवी प्रसिद्धी (fradulant advertisement)करायला बंदी घालणारा नियम केंद्र सरकारने केला आहे, मात्र महाराष्ट्रात असा काही कायदा नाही . त्यामुळे या लोकांची मनमानी सुरु आहे. ग्रामीण भागात एक म्हण आहे, 'लेकरू लोकांच अन नाचतंय ... ' तशी काहीशी अवस्था कोचिंग क्लासेस चालकांनी महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राची करून ठेवली आहे.
 

एखादा विद्यार्थी ज्यावेळी एखाद्या परीक्षेत यश मिळवितो, त्यावेळी त्यात सर्वात महत्वाचे असतात ते त्या विद्यार्थ्यांचे श्रम , त्याच्या जोडीला त्याला शिकविणारे शिक्षक, त्याच्यासाठी रात्री जागून काढणारे पालक , खाजगी शिकवणी लावलेली असेल तर त्या शिकवणीत मिळालेले 'धडे ' (Lesson)या साऱ्याचे योगदान असतेच, नाही असे नाही , पण ते सारे बाजूला सारून या विद्यार्थ्याला आमच्यामुळेच यश मिळाले अशी जाहिरातबाजी करण्याची टूम मागच्या दशकभरात सुरु झाली आहे. मागच्या काही काळात तर एकच विद्यार्थी आमच्यामुळेच यशस्वी झाला म्हणून बॅनरबाजी(Banner) करणारे अनेक क्लासेस देखील अनेक ठिकाणी समोर आले, त्यातून गुंडागर्दीच्या घटना देखील घडल्या , मात्र याची कुठीलीही खंत खाजगी क्लासेसवाल्यांना वाटली नाही. खरेतर विद्यार्थ्यांचा असा 'बाजारीकरणा'साठी(Marketing) वापर करणे चूकच , मात्र क्लासेसवाले तो करतात , विद्यार्थी किंवा पालकांना देखील याचे फारसे काही नवावगें वाटले नाही . वाटलेच तर आपल्या लेकराचे फोटो झळकतात याचे कौतुकच  वाटत गेले. पण त्याचा क्लासेसवाल्यानी मात्र बाजार मांडला.
खरेतर कोणत्याही खाजगी कोचिंग क्लासेसवर एक  नजर टाकली तर प्रत्येकवर्षी किमान ४००-५००  विद्यार्थी कमीत कमी त्या क्लासला असतात , त्यातल्या १० -२० विद्यार्थ्यांचे गुण बॅनरवर झळकवण्याइतके असतात, मग उर्वरित इतर विद्यार्थ्यांचे काय होते ? त्यांना किती यश मिळते ? त्यातील किती विद्यार्थ्यांना कुठे प्रवेश मिळाला ?किती विद्यार्थ्यांची 'निट'निटकी झाली याबद्दल कोणीच बोलत नाही. जर मूठभर विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले म्हणून श्रेय घेतले जाणार असेल तर लाखो रुपयांचे शुल्क भरून देखील 'सर्वसाधारण'च राहिलेल्या विद्यार्थ्यांबद्दलच्या अपश्रेयाचे(Failure) काय? याबद्दल कधीच चर्चा होत नाही आणि क्लासेसवाले देखील याचे उत्तर देण्याच्या भानगडीत कधी पडत नाहीत.
मुळातच , क्लासेसवाल्यानी असली फसवी जाहिरातबाजी करणेच चुकीचे . महाराष्ट्रात जो कायदा अस्तित्वात येऊ शकला नाही, त्या महाराष्ट्र खाजगी कोचिंग क्लासेस नियमन कायदा २०१८(Maharashtra  private coaching classes regulation act 2018)मध्ये अशा जाहिरातबाजीवर निर्बंध लावण्याची तरतूद होती, केंद्राच्या शिक्षण मंत्रालयाने जानेवारी २०२४ मध्ये जी नियमावली (Guidelines 2024)जाहीर केली, त्यातही फसवणूक करणाऱ्या जाहिराती करता येणार नाहीत असे स्पष्ट केले आहे, पण त्या नियमांचे महाराष्ट्रात कायद्यात रूपांत झाले नाही. असे काही होऊ देण्याची खाजगी क्लासेसवाल्यांची मानसिकता नाही. केवळ आपल्या दुकानदाऱ्या चालल्या पाहिजेत यासाठी कोणत्याही पातळीला जायचे आणि कशाचेही श्रेय (Credit)लाटायचे उद्योग खाजगी क्लासेसवाल्यांकडून सर्रास सुरु आहेत. मोठ्याप्रमाणावर क्लासेस तेच करीत आहेत. गावातील रस्ते आणि चौक अशा लोकांच्या बॅनरबाजीने विद्रुप होत आहेत, अशा बॅनरबाजीला पालक भुलत आहेत आणि यातून गल्ला मात्र क्लासेसवाल्यांचा भारत आहे, पण याला आवार घालायचा कोणी ? आता पावसाळी अधिवेशनात(Monsoon session) महाराष्ट्र सरकार खाजगी क्लासेसच्या नियमांचं कायदा करणारे विधेयक आणणार असल्याचे सांगितले जाते, बीडमध्ये घडलेल्या घटनेनंतर तरी शासनाचे डोळे उघडावीत आणि कठोर नियमावली यावी अशी अपेक्षा आहे, मात्र जे २०१८ पासून होऊ शकले नाही, ते आता होईल तेव्हा खरे. तो पर्यंत ग्रामीण भागात म्हणतात तसे 'लेकरू लोकांच आणि नाचतय ... 'या थाटातला क्लासेसवाल्यांचा अभद्र बॅनरबाजीचा नाच पाहत राहण्याशिवाय पालकांच्या आणि जनतेच्या हातात आहे तरी काय ? (क्रमशः )

Advertisement

Advertisement