Advertisement

मागच्या पाच वर्षातील अनुदान वाटपाची होणार चौकशी

प्रजापत्र | Saturday, 21/06/2025
बातमी शेअर करा

 बीड दि. २० (प्रतिनिधी ) : नैसर्गिक आपत्तीच्या अनुदान वाटपात झालेल्या गैरव्यवहारात जालना जिल्ह्यात तब्बल २१ अधिकारी, कर्मचारी निलंबित झाल्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्वच जिल्ह्यांमध्ये अनुदान वाटपाची चौकशी होणार आहे. बीड जिल्ह्याने यात एक पाऊल पुढे टाकले असून मागच्या पाच वर्षातील अनुदान वाटपाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी काढले आहेत. यासाठी पाच उपविभागासांसाठी पाच पथके गठीत करण्यात आली असून त्यांना १५ दिवसात अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जालना जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीच्या अनुदान वाटपातील घोटाळा आ. बबनराव लोणीकर यांच्यामुळे समोर आला होता. लोणीकर यांनी या प्रकरणात आवाज उठविल्यानंतर जालना जिल्ह्यातील २१ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर विभागीय आयुक्तांनी संपूर्ण मराठवाड्यातील अनुदान वाटपाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. सुरुवातीला इतर जिल्ह्यांमधील पथकांमार्फत ही चौकशी होणार होती, त्यात नंतर बदल करण्यात आले आणि जिल्हांतर्गत अधिकाऱ्यांकडूनच चौकशी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
त्यानुसार आता बीड जिल्ह्यात मागच्या पाच वर्षातील अनुदान वाटपाची चौकशी केली जाणार आहे. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी हे आदेश काढले आहेत. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सदर चौकशी होणार आहे. यासाठी महसूल, कृषी या विभागांच्या अधिकाऱ्यांची पथके गठीत करण्यात आली आहेत. प्रत्येक उपविभागासाठी एक अथक गठीत करण्यात आले असून या पथकांना चौकशीसाठी १५ दिवसांची डेडलाईन देण्यात आली आहे.

 

अशी आहेत पथके
बीड उपविभाग : अरविंद लाटकर ,कारभारी पौळ ,जे.बी. भगत ,राजेंद्र नेटके  
पाटोदा उपविभाग : गौरव इंगोले, बी. एम. खेडकर ,गणेश बादाडे
परळी उपविभाग : दीपक वजाळे,व्ही पी पवार
अंबाजोगाई उपविभाग : कविता जाधव, ए. व्ही. साळी ,ए. डी. म्हस्के
माजलगाव उपविभाग : वसीमा शेख,जे. एल. तरटे ,एस. एस. पठाडे , ए, जी. शेळके

Advertisement

Advertisement