Advertisement

 पत्नी घर सोडून गेली अन् बाप बनला हैवान?

प्रजापत्र | Thursday, 07/05/2026
बातमी शेअर करा

पुणे  : कौटुंबिक वाद आणि पत्नी घर सोडून गेल्याच्या नैराश्यातून एका पित्याने स्वतःच्या चिमुकल्या मुलीची हत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पुणे-नाशिक महामार्गालगत संतवाडी परिसरात ही धक्कादायक घटना उघडकीस आली असून संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

     पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी सागर सदाशिव शिंदे (वय २९, रा. मोशी, पुणे) याला आळेफाटा पोलीस स्टेशन यांनी अटक केली आहे. आरोपीची पत्नी सुमारे सहा महिन्यांपूर्वी घर सोडून गेली होती. त्यानंतर दोन लहान मुलांचा सांभाळ करताना आरोपी मानसिक तणावात होता. याच कारणातून त्याने टोकाचा निर्णय घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

५ मे रोजी सकाळी आरोपीने मुलगा आर्यन (वय ५) आणि मुलगी हर्षदा (वय ३.५) यांना फिरायला घेऊन जात असल्याचे सांगून घराबाहेर नेले. रात्री उशिरा त्याने संतवाडी येथील निर्जन जंगल परिसर गाठला. तेथे प्रथम मुलगा आर्यनचा गळा दाबून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. आर्यन बेशुद्ध पडल्याने तो मृत झाल्याचे समजून आरोपीने त्याला जंगलातच टाकून दिले.  यानंतर आरोपीने स्वतःच्या मुलगी हर्षदाचा गळा आवळून निर्घृण हत्या केली. गुन्हा लपवण्यासाठी तिचा मृतदेह झाडाझुडपात फेकून दिल्याचे तपासात समोर आले आहे. बुधवारी सकाळी जंगल परिसरात आर्यन बेवारस अवस्थेत आढळल्यानंतर पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. चौकशीत आरोपी सागर शिंदे याच्यावर संशय बळावला. सुरुवातीला त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र कसून चौकशीनंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.आरोपीच्या कबुलीनंतर पोलिसांनी घटनास्थळावरून चिमुकलीचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेअंतर्गत खून आणि खुनाचा प्रयत्न यांचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

Advertisement

Advertisement