निवडणुकीच्या काळात मते मिळविण्यासाठी म्हणून कधी शेतकरी सन्मान तर कधी लाडकी बहीण सारख्या योजना जाहीर करायच्या, सामान्यांची मते मिळवायची आणि मग मात्र पुन्हा सर्वांचे 'बाप' होण्याचा प्रयत्न करायचा हा भाजपचा आणि सत्तेचा खरा चेहरा आहे. बबनराव लोणीकर यांनी जी मुक्ताफळे उधळली ती काही अनावधानाने निघालेली वाक्ये नक्कीच नाहीत, तर त्यांच्यातला सत्तेचा माज आणि अहंकार ते बोलत आहे. सरकार ज्या काही योजनांच्या माध्यमातून शेतकरी, नागरिक, महिलांना मदत करते त्या योजनांसाठीचा पैसे काही बबनराव लोणीकरांसारखे लोक मजुरी करून आणतात आणि त्यांच्या मजुरीतून मग या योजना राबविल्या जातात असे नाही, पण सत्तेची मस्ती डोक्यात गेल्यावर काय होते तेच बबनराव लोणीकरांनी दाखविले आहे.
सत्ता व्यक्तीला मस्तवाल बनवीत असते, आणि त्यातही एखादी सत्ता मोठ्या बहुमताने मिळविलेली असेल किंवा आपल्याला कोणी विरोधकच नाहीत अशा परिस्थितीतली असेल तर मग त्या सत्तेची हवा डोक्यात घुसायला वेळ लागत नाही. एकदा का सत्ता अशी डोक्यात घुसली की माणसाचा विवेक हरवतो आणि अहंकार वाढत जातो. आपणच जणू काही साऱ्या जगाचे कर्तेधर्ते आहोत असला विकृत दर्प त्याच्या वागण्यातून जाणवायला लागतो, महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांच्या बाबतीत सध्या तेच जाणवत आहे. काही दिवसांपूर्वी राज्याच्या कृषी मंत्र्यांची शेतकऱ्यांबद्दलची मते समोर आली होतीच, त्यातून मंत्र्यांना सामान्यांच्याप्रती संवेदना किती आहेत हे स्पष्ट झाले होतेच. आता भाजपचे आमदार असलेल्या बबनराव लोणीकरांनी अशीच मुक्ताफळे उधळली आहेत. 'तुझ्या बापाला पेरणीला पैसा आम्ही देतो, तुझ्या आईला साडीला पैसे आम्ही देतो, तुझ्या पायातली खेटर आमच्या पैशातली आहेत ' असले काही बाही लोणीकर बोलून गेले. बबनराव लोणीकर हे अनावधानाने बोलले असतील असे देखील म्हणायला बिलकुल जागा नाही, कारण बबनराव लोणीकर हे काही राजकारणात नवखे नाहीत. तरीही ते हे बोलतात म्हणजे कोठेतरी सत्तेच्या मस्तीचा दर्प त्यात जाणवतोच.
सरकारने योजना जाहीर करायच्या, त्यावर मते मिळवायची , त्या मतांच्या आधारे सत्ता मिळवायची, सत्तेच्या खुर्च्या उबवून त्यातून स्वतःचा स्वार्थ साधायचा आणि पुन्हा सामान्यांनाच दूषणे द्यायची हा दुटप्पीपणा सध्या भाजपच्या अंगवळणी पडलेला आहे. या मानसिकतेतूनच लोणीकर बोलले. आता फडणवीसांनी यावर त्यांना काही कानपिचक्या दिल्या आणि त्यामुळे त्यांनी माफी मागितली असली तरी यातून सत्ताधाऱ्यांची खरी मानसिकताच उघड झाली आहे. जणू काही आपण आपल्या घरातून लोकांना निधी देत आहोत असली विकृत मानसिकता जर राज्यकर्ते ठेवत असतील तर त्यांच्या डोक्यातील सरंजामशाही अजून गेलेली नाही असेच म्हणावे लागेल. मुळात लोणीकर काय, तिकडे राष्ट्रवादीमध्ये माणिकराव कोकाटे काय किंवा निवडणुकीच्या अगोदरच आम्हाला मतदान केले नाही तर लाडक्या बहिणींना दिलेला लाभ काढून घेऊ म्हणणारे शिंदे सेनेचे शिलेदार काय, हे सारे सत्तेच्या अहंकाराची उदाहरणे आहेत. सरकारी तिजोरीतील निधी म्हणजे जणू काही स्वतःची खाजगी जहागिरी आहे असली मानसिकता जी वाढीस लागली आहे, त्याचे हे परिणाम आहेत. यात कोणीच अपवाद म्हणावे असे नाही. अजित पवारांसारखा नेता देखील कारखान्याच्या निवडणुकीत काय भाषणे करतो हे राज्याने अनुभवले आहेच. त्यामुळेच मस्तवालपणा हाच सत्तेचा खरा चेहरा आहे. जनतेने सत्ता दिली, मात्र त्याच जनतेचे बाप होण्याची मस्ती जी राजकारणात घुसली आहे, त्या मस्तीला धक्का देण्याची क्षमता देखील जनतेमध्येच असते हे देखील विसरले जाऊ नये.