Advertisement

मुसळधार पावसाने मुंबईला झोडपलं, पुणे पाण्यात

प्रजापत्र | Thursday, 19/06/2025
बातमी शेअर करा

मुंबई :हवामान विभागाने राज्यातील बहुतांश भागात पावसाची (Maharashtra Rain Updates) शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला आहे. कोकणसह घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात वीजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. दरम्यान, पुण्यात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असून शहरातील अनेक ठिकाणचे रस्ते पाण्यात गेले आहेत. यामुळे प्रचंड वाहतूक कोडींही झाली आहे. सिंहगड रोडवर पाणी साचलं आहे.

 

सिंहगड रस्त्यावर पाण्याचा वाहतुकीला फटका

पुण्यातील शासकीय विश्रामगृहात पाणी घुसल्याचंही समोर आलं आहे. रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. वडगाव खुर्द इथल्या लालगड मळा वाहतूक सिग्नलवर खोदकाम सुरू आहे. खड्डा पाण्याखाली गेला असून इथं पाणी साचलं असल्यानं अपघाताची शक्यता आहे. सकाळपासून पुण्यात पावसाची संततधार सुरू आहे. धायरी सिंहगड रोडवर वाहतूक कोंडी झालीय. पुढचे २४ तास मुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

रायगडमध्ये नद्यांना पूर

रायगडमध्येही पावसाची संततधार सुरू आहे. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झालीय. अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. खोपोली-वाकण वाहतूक ठप्प झाली आहे. कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडलीय. अंबा नदीचं पाणी रस्त्यावर आलं आहे. पोलिसांनी रस्त्यावर पाणी आलेल्या मार्गावरून वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे.

रायगड जिल्ह्यात शाळांना सुट्टी

रायगडला अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलीय. खोपोली, पेण, रोहा या ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. नदी किनारी राहणाऱ्या नागरिकांसह सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

ठाण्यात पावसाने वाहतुकीला फटका

ठाण्यात पावसाने यलो अलर्ट दिला आहे. बुधवारी रात्रभर ठाण्यात पावसाची संततधार सुरू आहे. घोडबंदर-नाशिक रोड या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतुकीला पावसाचा मोठा फटका बसला आहे. शहापूरमध्ये रात्रभर पावसामुळे कानवा नदीला पूर आला आहे. गावातलं नदीकाठचं मंदिर पाण्याखाली गेलं आहे.

 

इंद्रायणीच्या पाणीपातळीत वाढ

आळंदीतही मुसळधार पाऊस सुरू असून इंद्रायणीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. आज माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होत असताना इंद्रायणी काठावर वारकरी पावसाचा आनंद घेत आहे. इंद्रायणीच्या पाण्याच्या प्रवाहाचा वेग वाढल्यानं एनडीआरएफच्या तुकड्या सज्ज करण्यात आल्या आहेत. वारकऱ्यांना नदी पात्रात उतरू नये असं आवाहन करण्यात आलं आहे.

 

पालघरमध्ये वाहतूक कोंडी

पालघरमध्ये जव्हार मोखाड्यात मुसळधार पाऊस सुरू असून गारगाई नदीला पूर आला आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. तर पालघर मुंबई-अहमदाबाद महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झालीय. महामार्गावर ७ ते ८ किमी रांगा लागल्या आहेत. महामार्गाचं काम अनेक महिन्यांपासून रखडले आहे. याचा फटका वाहनचालकांना बसत आहे.

 

नाशिकमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस

नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस पडला. गेल्या तीन दिवसांपासून नाशिकमध्ये पाऊस सुरू आहे. मंदिर परिसरात गुडघाभर पाणी साचलं होतं. तर जळगावमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे शेतीकामांना वेग आला आहे. नंदुरबारमध्ये पाताळगंगेला पूर आला आहे.

 

रत्नागिरीत पावसाने प्रचंड नुकसान

रत्नागिरी सिंधुदुर्गला पावसाने गेल्या आठवड्याभरात झोडपलं आहे. यामुळे शेतीसह घरं, सार्वजनिक मालमत्ता यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. दरडी कोसळण्याच्या घटनाही घडल्या आहेत. सुदैवानं दरड कोसळण्याच्या घटनेत कोणती जिवीत हानी झालेली नाही.

 

कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता

मान्सून पूर्ण राज्यात सक्रीय झाला असून सर्वदूर पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकणसह घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा, विदर्भात वीजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय.

Advertisement

Advertisement