अहिल्यानगर : वाढदिवसाचे सेलिब्रेशन करण्यासाठी अनकेदा खटाटोप केले जातात, नवनवीन युक्त्या लढवल्या जातात. काहीजण आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करतात. तर, अनेकजण केक कापून, मित्रांसोबत पार्टी करुन वाढदिवस साजरा करतात. अहिल्यानगर (Ahilyangar) जिल्ह्यातील कोपरगावर येथे वाढदिवस साजरा करण्यासाठी चक्क एकाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
८ जूनला कोपरगाव तालुक्यातील गणेश चतर हे (४२) वर्षीय शिर्डी जवळील नांदुर्खी परिसरात काम निमित्ताने आले होते. मात्र, १२ जूनला त्यांचा मृतदेह त्याच परिसरातील एका शेतात आढळून आला. त्यानंतर शिर्डी पोलिसांनी (police) तपासाची चक्र फिरवत अवघ्या २४ तासात या खुनाचा उलगडा केला आहे. विशेष म्हणजे वाढदिवसाची (Birthday) पार्टी करण्यासाठी ४२ वर्षीय गणेश चतर यांच अपहरण करून त्यांना लुटण्याच्या उद्देशाने केलेल्या मारहाणीत त्यांचा जीव जीव गेल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.
पोलिसांना हत्येचं कारण समजल्यानंतर एकच खळबळ उडाली असून, या हत्याप्रकरणातील ७ पैकी ६ आरोपी अल्पवयीन आहेत हे विशेष. १२ जून २०२५ रोजी शिर्डीजवळील नांदुर्खी शिवारात एका शेतात कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह स्थानिकांना आढळून आला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळीत धाव घेत पंचनामा केला व अकस्मात मृत्यूची नोंद देखील करण्यात आली. कुजलेल्या अवस्थेतील मृतदेहाची ओळख पटविण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं. पोलिसांनी देखील वेगाने तपासाची चक्र फिरवत मृतदेहाची ओळख पटवली.कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील गणेश चतर हे (४२ ) वर्षीय इसम बेपत्ता असल्याची तक्रार कोपरगाव पोलीस ठाण्यात दाखल होती. त्या मिसिंगचा धागा पकडत पोलिसांना तपासात यश आलं. त्यानंतर, सदर मृत व्यक्तीच्या मोबाईलचा सीडीआर व कुटुंबीयांकडून केलेल्या चौकशीत ही घटना समोर आली. वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी लुटण्याच्या उद्देशाने राहता तालुक्यातील ७ जणांनी मिळून या व्यक्तीचा खून केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं. या तपासाबाबत शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी शिरीष वमने यांनी अधिक माहिती दिली.
मयत गणेश चतर हे लग्नासाठी बाहेरगावी गेल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. मात्र, ८ तारखेला गेल्यावर ते परतलेच नाहीत. या सगळ्या घटनेत अल्पवयीन मुलांची जर टोळी असेल तर या टोळी मागील सूत्रधाराचा शोध घेण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे. वयाचा फायदा मिळाल्याने मुलांची सुटका लवकर होते. याबाबतीत देखील पोलिसांनी लक्ष घालून आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा मिळावी, अशी मागणी मयत गणेश चतर यांच्या मामांनी केलीय. तर आमच्या भावाला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी गणेश यांचा भाऊ दत्तात्रय चतर आणि रावसाहेब गडाख यांच्या मामाने केली आहे.