धाराशिव दि.१३ (प्रतिनिधी): धाराशिव जिल्हा वार्षिक योजना २०२४-२५ अंतर्गत सर्वसाधारण कामांवरील स्थगिती तात्काळ उठवावी, अशी मागणी धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन) यांच्याकडे केली आहे.
जानेवारी २०२५ मध्ये पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सर्व सदस्यांच्या संमतीने जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांसाठी निधी वितरणाचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी कोणताही आक्षेप नोंदवलेला नव्हता. मात्र, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निधी वितरणाबाबत तक्रार केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्र्यांच्या संमतीने निधी वितरणावर स्थगिती देण्यात आली. धाराशिव हा आकांक्षित जिल्हा असल्याने आरोग्य, शिक्षण, जलसंधारण, महिला व बालकल्याण तसेच महावितरणसारख्या महत्त्वाच्या विभागांची अनेक कामे निधीअभावी रखडली आहेत. या स्थगितीमुळे जिल्ह्यातील दैनंदिन जीवनमानावर गंभीर परिणाम होत असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, "धाराशिव वगळता इतर कोणत्याही जिल्ह्यात २०२४-२५ च्या वार्षिक योजनेतील निधी वितरण शिल्लक राहिलेले नाही. मी पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर पूर्वीच्या सूत्रानुसार सर्वसहमतीने निधीचे वितरण केले आहे. आ. पाटील यांच्याकडून संवादाचा कोणताही प्रयत्न झालेला नाही. मंत्रालयातही अनेक वेळा चर्चा झाली, मात्र तोडगा निघालेला नाही."
येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही ही स्थगिती उठवणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. "महायुती सरकार हे विकासाला प्राधान्य देणारे सरकार आहे, अशी धारणा जनतेत आहे. त्यामुळे त्वरित निर्णय घेऊन निधी वितरण सुरू करावे," अशी विनंतीही त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी निधी वितरणावरील स्थगिती उठवून कामांना गती देण्यात यावी, अशी मागणी आता अधिकच तीव्र होत आहे.