Advertisement

 बच्चू कडूंच्या समर्थनार्थ प्रहारचे कार्यकर्ते उतरले रस्त्यावर!

प्रजापत्र | Friday, 13/06/2025
बातमी शेअर करा

नाशिक : शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी माजी राज्यमंत्री आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळू लागला आहे. नाशिकमध्येही प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातूनही कडू यांना समर्थन मिळू लागले आहे.शेतकऱ्यांची कर्जमाफी तसेच दिव्यांग आणि अन्य मागण्यासाठी बच्चू कडू यांनी गुरुकुंज, मोझरी येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे. राज्यभरातून या आंदोलनाला वाढता पाठिंबा मिळत असल्याने ते चर्चेचा विषय ठरले आहे.

 

       शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बच्चू कडू यांनी राज्य सरकारला घेरले आहे. निवडणुकीत शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा करण्यात आली होती. कापूस आणि अन्य पिकांना हमीभाव वाढवून देण्याची घोषणा देखील करण्यात आली होती. या आधारेच भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात सत्तेत आला. मात्र या घोषणांचे पालन होत नसल्याची टीका प्रहार संघटनेने केली आहे.

बच्चू कडू यांच्या आंदोलनाला नाशिक जिल्ह्यातूनही मोठा पाठिंबा मिळू लागला आहे. पाटोदा (येवला) येथील ग्रामस्थांनी बच्चू कडू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांच्या समर्थनात काल पाटोदा गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. येथील नागरिक कडू यांच्या आंदोलनस्थळी जाऊन सहभागी देखील होणार आहेत.

नाशिक रोड येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेतर्फे नाशिक पुणे महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. राज्य शासनाने बच्चू कडू यांच्या आंदोलनाची तातडीने दखल घेऊन त्यांच्या मागण्यांवर चर्चा करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

संघटनेचे जिल्हाप्रमुख अनिल भडांगे उत्तर महाराष्ट्र प्रमुख चंद्रभान गांगुर्डे ललित पवार रवींद्र टिळे अरुण पाचोरे संतोष मानकर यांसह असंख्य पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते. काही काळ या आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.

नाशिक रोड विभागीय महसूल आयुक्त कार्यालयाबाहेर प्रहार संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले. दिव्यांग संघटनांच्या मागण्या आणि शेतकरी प्रश्नांवर महायुती सरकार आपलेच आश्वासन विसरले आहे.

जनतेच्या हितासाठी कडू यांचे अन्यत्याग आंदोलन सुरू आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी असंख्य संघटना यावेळी एकत्र आल्या होत्या. यानिमित्ताने बच्चू कडू यांच्या आंदोलनाला नाशिक जिल्ह्यातून पाठिंबा मिळू लागल्याचे चित्र आहे.

Advertisement

Advertisement