Advertisement

आंतरजातीय विवाह केल्याचा राग,जावयावर हल्ला

प्रजापत्र | Monday, 04/08/2025
बातमी शेअर करा

पुणे : जिल्ह्यातील खेड तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. 'सैराट' चित्रपटातील प्रसंग आठवण करून देणारा प्रकार घडला आहे. या प्रकरणात खरपुडी गावात राहणाऱ्या आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यावर हल्ला करून तरुणीचे तिच्या नातेवाईकांकडून अपहरण करण्यात आले आहे. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत एकूण १५ जणांविरोधात गंभीर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये संबंधित महिलेचा भाऊ,आई आणि इतर नातेवाईकांचा समावेश आहे.

      पुण्यातील खेड येथील खरपुडी गावात राहणारे विश्वनाथ गोसावी आणि प्राजक्ता गोसावी (वय २८) या दाम्पत्याने समाजातील विरोधाला न जुमानता प्रेमविवाह केला होता. दोघेही काही काळापासून गावात स्थायिक होते. मात्र त्यांच्या या नात्याला प्राजक्ताच्या नातेवाईकांनी कडाडून विरोध केला होता. रविवारी, ३ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास, प्राजक्ताचे कुटुंबीय गावात आले. त्यांनी आधी विश्वनाथवर हल्ला करत त्याला बेदम मारहाण केली आणि नंतर प्राजक्ताचे अपहरण करत तिला बळजबरीने घेऊन गेले. या प्रकाराने गावात एकच खळबळ उडाली.या प्रकरणी खेड पोलीस स्टेशनमध्ये अपहरण, मारहाण व बळजबरीच्या आरोपाखाली १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला असून प्राजक्ताचा ठावठिकाणा शोधण्यासाठी वेगाने कारवाई सुरू आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले, "संपूर्ण प्रकरण गंभीर असून सामाजिक सौहार्द बिघडू नये म्हणून आम्ही गांभीर्याने तपास करत आहोत. आरोपी लवकरच आमच्या ताब्यात असतील."

 

आंतरजातीय विवाहाचा विरोध अजूनही कायम
ही घटना केवळ एका प्रेमविवाहाचा प्रश्न नसून, समाजातील जातीय तेढ आणि जुनाट मानसिकतेचे दर्शन घडवणारी आहे. प्राजक्ताला जबरदस्तीने पळवून नेल्याची बाब तिच्या इच्छेविरुद्ध असल्याचे संकेत मिळत असून यामुळे कायद्यानेदेखील हा गंभीर गुन्हा ठरतो. प्रकरण संवेदनशील असल्याने पोलिसांनी खरपुडी गावात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ग्रामस्थांनाही शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement